अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ


१९६०साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १९६१ मध्ये पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, औरंगाबादची मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि नागपूरचा विदर्भ साहित्य संघ ह्या त्यात्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङ्मयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय.

वर सांगितलेल्या या महामंडळाच्या चार संस्थापक संस्था असून त्या कायम घटक संस्था मानण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यातील, संपूर्ण प्रदेशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था, तसेच बाहेरील देशांमध्ये त्या संपूर्ण देशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था ह्यांना महामंडळात समाविष्ट करून घेता येते. सध्या महामंडळातील अशा संस्था मराठी साहित्य परिषद (हैदराबाद), मराठी साहित्य सेवक मंडळ (गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), मराठी साहित्य परिषद (तेलंगण राज्य), छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद (बिलासपूर) आणि मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ (भोपाळ) या सामाविष्ट संस्था आहेत. याशिवाय संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व न करणाऱ्या साहित्य संस्थेला संलग्न संस्था म्हणून मान्यता मिळते. मराठी वाङमय परिषद (बडोदे) ही अशी संलग्न संस्था आहे. महामंडळावर घटक संस्थेचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी, समाविष्ट संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि सर्व संलग्न संस्थांचे मिळून जास्तीत जास्त तीन प्रतिनिधी सभासद असतात


इतिहास :

सर्व मराठी भाषिक मुलुख एका राज्य छ्त्राखाली आणण्याचा विचार राजकीय क्षेत्रामध्ये गतिमान झाला होता. त्या विचाराला बळ देण्यासाठी आणि मराठी भाषा व साहित्य ह्या संदर्भातील समान प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेसकट वेगवेगळ्या मराठी साहित्य संस्थांना एकत्र आणण्याचे आणि सर्वांची मिळून एक प्रातिनिधिक संस्था स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्या प्रयत्नांची परिणती १९५१ मध्ये सर्व साहित्य संस्थांच्या प्रतिनिधींची मिरज येथे बैठक होण्यात झाली. कविवर्य अनिल उपाख्य आत्माराम रावजी देशपांडे यांचा त्यात पुढाकार होता. मिरजेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानीही अनिलच होते. या बैठकीत सर्व संस्था मिळून तयार होणाऱ्या संघ-संस्थेच्या घटनेचा मसुदा तयार करण्यात आला. संकल्पित संस्थेला 'मराठी साहित्य महामंडळ' असे नाव द्यावे अशी अनिलांनीच सूचना केली. महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करीत असून, लोकसहभागातून संमेलने व विविध उपक्रम राबविले जातात.

घटक संस्था:

१. मराठी साहित्य संघ (मुंबई) -कार्यक्षेत्र मुंबई शहर व उपनगरे. आजीव सभासद २०००. मतदारसंख्या १७५.
२ महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) -कार्यक्षेत्र कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश (एकूण १४ जिल्हे). आजीव सभासद : ९०००. मतदारसंख्या १७५.
३. मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद) -कार्यक्षेत्र मराठवाडा (आठ जिल्हे). आजीव सभासद २४००. मतदारसंख्या १७५.
४. विदर्भ साहित्य संघ (नागपूर)-कार्यक्षेत्र विदर्भ (११ जिल्हे). आजीव सभासद ६०००. मतदारसंख्या १७५.


दर तीन वर्षांनी बदलणारे कार्यालय

मराठी साहित्य महामंडळाचे व्यवस्थापकीय कार्यालय प्रत्येक घटक संस्थेकडे तीन वर्षांच्या मुदतीसाठी असते. पुढील क्रमानुसार ते फिरते: १. मुंबई मराठी साहित्य संघ. २. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. ३. विदर्भ साहित्य संघ, नागपूर. ४. मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद. आता महामंडळ कार्यालय विदर्भ साहित्य संघ,नागपूर येथे आहे.

कार्यकारिणी

सध्या (इ.स. २०१८)ची कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहेत.
अध्यक्ष - डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
उपाध्यक्ष - श्री सुधाकर भाले
कोषाध्यक्ष - डॉ. विलास चिंतामण देशपांडे
कार्यवाह - डॉ. इंद्रजीत ओरके

सभासद:

प्रा. मिलिंद जोशी
श्री प्रकाश पायगुडे
श्री पद्माकर कुलकर्णी
प्रा. उषा तांबे
डॉ. उज्वला मेहेंदळे
डॉ. अनुपमा उजगरे
प्रा. कौतिकराव ठाले पाटील
डॉ. दादा गोरे
श्री आसाराम लोमटे
डॉ. विद्या देवधर
श्री रमेश वसकर
डॉ. भालचंद्र शिंदे
श्री. कपूर वासनिक
श्री दिलीप खोपकर

शिवाय साहित्य संमलेनाचा अध्यक्ष हा पदसिद्ध सभासद असतो. सध्या डॉ. अक्षयकुमार काळे हे पदसिद्ध सभासद आहेत. प्रत्येक वर्षात महामंडळाच्या किमान चार सभा होत असतात. आणि या सभांमधून सर्व निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेण्यात येतात.

साहित्य संमेलने

महामंडळाच्या स्थापनेपर्यंत मराठीची जी साहित्य संमेलने भरत होती ती पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद भरवीत असे. या संमेलनांना 'महाराष्ट्र साहित्य संमेलन` असेच तोपर्यंत म्हटले जात होते. साहित्य महामंडळाने काम सुरू केल्यानंतर शक्यतो दरवर्षी एक साहित्य संमलेन भरवावे असा निर्णय १९६४मध्ये मडगांवमध्ये झालेल्या ४५व्या साहित्य संमेलनात घेतला आणि १९६५ मध्ये हैदराबाद येथे जे ४६ वे साहित्य संमेलन झाले ते महामंडळाचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय.

प्रत्यक्षात ते महामंडळाचे पहिले साहित्य संमेलन असतांनाही महाराष्ट्र साहित्य संमेलनाचेच ते नवे रूप असल्यामुळे संमेलनाचा अनुक्रमांक जुन्यावरूनच पुढे असा चालू ठेवण्यात आला आणि पुढील संमेलनांना महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे नाव देण्यात आले. तेच आजवर चालू आहे.

यंदाचे हे ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे, जे बडोद्यात भरणार आहे.

स्थापना दिवस

दरवर्षी महामंडळ आपला स्थापना दिवस साजरा करीत असते. महनीय वक्त्यांचे भाषण आणि दिवसभराचे चर्चासत्र असे त्याचे स्वरूप असते. ज्या मोठ्या लेखकांची किंवा विद्वानांची साहित्य संमेलनाचे किंवा महामंडळाचे अध्यक्ष होण्याची इच्छा नाही अशा लेखकांचा सन्मान व्हावा म्हणून, गेल्या सुमारे १५ वर्षांपासून, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने, आपल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात महनीय वक्ता म्हणून अशा साहित्यिकाला सन्मानपूर्वक निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यास सुरुवात केली. या प्रसंगी एखाद्या वाङ्मय प्रकाराचा किंवा त्या त्या कालखंडातील वाङ्मयावर चर्चा घडवून आणली जाते.

महाराष्ट्रात वेळोवेळी भाषाविषयक किंवा संस्कृतीविषयक जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांचा समाजाकडे किंवा शासनाकडे पाठपुरावा करून ते प्रश्न सोडविण्यासाठी महामंडळ प्रयत्न करीत असते.